Sunday, 13 November 2016

कवी विष्णू थोरे




नाव : विष्णू थोरे 

साहित्यिक परीचय : कवी-गीतकार

नाशिक जिल्ह्यातील 'चांदवड' या खेडेगावातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कवी विष्णू थोरे यांचं बालपण शेत वावरात आणि पिक उगवणाऱ्या मातीत झालं.तिथेच ते मोठे झाले.एम ए (मराठी) पर्यंत त्यांचे शिक्षण झाले तरीही त्यांनी त्यांच्या वावराशी नात तोडलं नाही तर शेतकरी म्हणून जवाबदारी निभावून मातीशी घट्ट केलं.त्यातच कलेची आवड म्हणून चित्रकलेला पसंती दिली आणि हि कला आत्मसाद केली.
ते उत्कृष्ट चित्रकार आहेत. आजवर त्यांनी सुमारे ४५० मुखपृष्ठांची निर्मिती केली ज्यात अनेक मान्यवर-नामवंत कवी,लेखक आणि साहित्यिकंपासून ते ग्रामीण,स्थानिक कवी,लेखकांच्या काव्यसंग्रह आणि लेखसंग्रहाचा समावेश आहे. त्यांनी साकारलेल्या मुखपृष्ठांना अतिशय मार्मिक आशय,विषयानुरूप संवेदनशील रंगछटा यातून पारंपरिक तसेच आधुनिक शैलीच प्रभावी स्वरूप प्राप्त होत. आणि रचनात्मक अभिकल्पना साकारून येते.
कलेच्या या माध्यमातून त्यांच्यातील कवी मन वेळोवेळी प्रत्ययास आले आहे आणि त्यातूनच त्यांचा 'धुळपेरा उसवता...' या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आणि हा काव्यसंग्रह नुकताच वर्षभरापूर्वी प्रकाशित झाला.ज्यात त्यांनी शेतीच्या,मातीच्या,कुंपणाच्या,
तिफनाच्या,नांगराच्या,झाडांच्या,माणसांच्या,जीवाच रान करणाऱ्या बापाच्या,राब राब राबणाऱ्या मायच्या,वावरातील बैलांच्या,शेतकऱ्यांच्या दुःखाच्या कविता लिहिल्या आहेत. 

ग्रामीण भागात शेतात जीवाचं रान करणाऱ्या शेतकरी आणि शेतीविषयी त्यांच्या 'सांजदिवे' या कवितेत ते लिहितात...

"ओलावल्या मातीनेच
रुजायला दिला लळा...
भोगताना दुःख नवे
मातीलाच पुन्हा कळा..."

तसेच जिवाच्या आकांताने कष्ट करूनही शेतकऱ्याच्या वाट्याला दुःखच येत तेव्हा ते त्यांच्या 'कुपान' कवितेत लिहितात,

"पिकवून जगण्याचा
झाला भरवसा खोटा
कुणब्याच्या नशिबात
हरसाल भोगवटा..."

वावरातील असंख्य मौसमाना सहन करत वर्षों वर्ष तटस्थ उभ्या असणाऱ्या झाडांविषयी ते आपल्या 'झाडांचं सनातन दुखणं' या कवितेत म्हणतात...

"झाडांनो,
किती ऋतू,किती पक्षी
कितीतरी माणस
येत गेली तुमच्यासोबतील
कुऱ्हाडीचे अमानुष बलात्कार
झालेच की तुमच्याही देहावर
तुम्ही नाही जपले का 
कुठले घाव ?
एखादी जखम 
ठसठसणारी..."

एवढ्या सर्व आत्मकेंद्री विषयांचं वर्णन करताना ते आपल्या आत्मीयतेचे प्रतीक आपल्या माय विषयी लिहायला विसरले नाही.त्यांनी त्यांच्या 'ममतेची ओल' या कवितेत ते लिहतात...

"माय पोशिंदा घराची
गाढा ओढत राहिली
आम्ही शिकावं म्हणून
तिच्या उरात काहिली..

माय कस वं जमत
तुला उसनं पासण
दुःख मुखाच झाकून
हसू डोळ्यात नेसन..."

धुळपेरा उसवता...या त्यांच्या काव्यसंग्रहाविषयी ते आपल्या कवितेत कवी म्हणून भूमिका मांडतात...

"धुळपेरा उसवता
गेले काळजाला चरे...
कोणी गोजिऱ्या मोराचे
पाय खुडले नाचरे..."

'धुळपेरा उसवता' हा त्यांचा काव्यसंग्रह ग्रामीण साहित्यातील बोली भाषेतील अत्यंत प्रतिभासंपन्न आणि महत्वाचा प्रकाशझोत ठरला आहे. या काव्यसंग्रहाचे नाशिक-मनमाड-भुसावळ-जळगाव इ. ग्रामीण भागातच नाही तर मुंबई,पुणे,कोल्हापूर इ. शहरातही जोरदार स्वागत झाले आणि तो वाचकांच्या पसंतीस उतरला.बोलीभाषेतील आशय आणि शब्दशैली मुळे या काव्यसंग्रहास 'गदिमा पुरस्कार,पुणे', 'यशवंतराव पुरस्कार,पुणे',
'डॉ.न.ना.देशपांडे पुरस्कार,कोल्हापूर' या प्रतिष्टीत पुरस्कारां सोबतच अनेक इतर पुरस्कार मिळाले.

त्यांच्या काही कवितांचा चित्रपट क्षेत्रात 'गीत' म्हणून सहभागही झाला ज्यात 'चौर्य' या आगामी चित्रपटात 'पायरीला गेले तडे...' आणि 'घाटी' या चित्रपटात 'मर्द खरा शोभतो हा घाटी...' या गीत लेखनाचा सहभाग झाला आहे.

त्याचसोबत ग्रामीण भाषेतील दर्जेदार भाषा आणि शब्दशैलीचा सादरीकरण या माध्यमातून 'गाव झालंय व्हिलेज..' या माती आणि नाती जपणाऱ्या काव्यवाचन कार्यक्रम ते  संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाड्यात,गावोगावी,शहरात ते आणि त्यांचे सहकारी सादर करतात.

आजच्या ग्रामीण कृषी व्यवस्थेत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेऊन शिकलेल्या तरुणांनी 'माती आणि नाती' टिकवताना कवी विष्णू थोरे यांचा आदर्श घ्यावा.

ग्रामीण भागात कृषी व्यवस्थेचं रडगाणं करत बसण्यापेक्षा शिकलेल्या ज्ञानातून आणि आत्मसात केलेल्या विविध कलेतून ग्रामीण कृषी व्यवस्था संवर्धन,ग्रामीण संस्कृती जतन आणि शेतीविषयी प्रेम,आदर आणि जिव्हाळा अधिक घट्ट करावा कारण हीच काळाची गरज आहे असे मला वाटते...

शब्द संकलन-सचिन सुशील.

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.

Friday, 11 November 2016

प्रा.आशालता कांबळे (जेष्टय कवयत्री-लेखिका)

'एक दिवस,एक लेखक'     

नाव - प्रा.आशालता कांबळे

व्यवसाय - प्राध्यापिका

साहित्यिक परीचय - जेष्टय कवयत्री - लेखिका    


प्रा. आशालता कांबळे ह्या 1978 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत, तर 1980 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत 
         कोकणातल्या एका खेड्यात 'साने गुरुजी कथेमालेपासून' त्यांची सामाजिक क्षेत्रातील वाटचाल सुरु होऊन, आज त्या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्तया
संविधान मूल्यांच साहित्य लिहिणाऱ्या लेखिका, कवयत्री, समिक्षिका म्हणून परिचित आहेत. गेली चाळीस वर्ष त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजाराच्यावर प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत. तसेच राज्यपातळीवरील आणि देशपातळीवरील अनेक परिषदांमध्ये सामाजिक विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केलेले आहे.
        त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं असून 'बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन' या पुस्तकास डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार' तसेच कोकण मराठी साहीत्य परिषदेच्या समीक्षेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'प्रभाकर पाध्ये पुरस्कार' प्राप्त झालाय. याशिवाय 'यशोधरेची लेक' हा कवितासंग्रह,  'आमची आई', 'समर्थ स्त्रियांचा इतिहास' हि त्यांची विशेष गाजलेली पुस्तके. यातील काही पुस्तकांची महाराष्ट्र शासन ग्रंथ खरेदी योजनेसाठी निवड झालेली आहे. आणि नॅशनल ब्लाईंड आसोसिअश (नॅब) संस्थेमार्फत ध्वनीमुद्रिकेच्या स्वरूपात रूपांतर झालेली आहे. 'वामनदादा कर्डक पुरस्कार', 'सोनबा येलवे पुरस्कार', 'अप्पासाहेब रणपिसे पुरस्कार', असे अनेक पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत. 'यशोधरेची लेक' मधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पादव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे. तसेच यातील काही गीतांचा ध्वनीमुद्रिकेत समावेश झालेला आहे. थेरीगाथा, थेरीगाथा, यशोधरा, रमाई, जिजाऊ, यांच्यावरील व्याख्यानाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. दूरदर्शन आकाशवाणीवरूनही त्यांची व्याख्याने तसेच मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. इंटरनेटच्या 
'यू ट्यूब' संकेस्थळावर थेरिगाथांवरील व्याख्यान आणि 'आम्ही सूर्याच्या लेकी' या माहितीपटातील मुलाखतीचा समावेश आहे. बहिणाबाईंची कविता, सावित्रीबाई कविता, कुसुमाग्रजांची कविता या साहित्यिक विषयांवरही त्यांची आभ्यासपूर्ण व्याख्याने सत्तात्याने   होत आसतात
         दैनिक 'सम्राट' आणि दैनिक ' महानायक' मधून त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेखन केलेले आहे. संविधान मूल्यांच्या साहित्याची मीमांसा ही समीक्षेतील संकल्पना घेऊन त्यांनी मराठीतील शंभर पुस्तकांची समीक्षा दोन वर्ष स्तंभलेखन करून वाचकांपर्यंत पोचवली. अनेक पुस्तकांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना, ललितलेख, वैचारिक लेख, प्रासंगिक लेख, कथा, कविता असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या चळवळीतील कामासाठी त्यांना ' 'सावित्रीबाई फुले' फातिमा शेख पुरस्कार 'समाजभूषण पुरस्कार' ' 'कस्तुरी महिला भूषण पुरस्कार' आशा अनेक पुरस्कारांनी गौरविलेले आहे. आशिया खंडातील कर्तृत्वान व्यक्तिंचा परिचय करून देणाऱ्या ' हुज- हू' या दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या 2013 च्या अंकात लेखिका म्हणून त्यांच्या लेखनकर्तृत्वाची ओळख समाविष्ट करण्यात आलेली आहे.

संकलन - मोहसीन भालदार/स्नेहल कुलकर्णी

संकल्पना - सचिन सुशील

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.