Saturday, 21 January 2017

लाखभर साहित्यसंपदा आणि साहित्याऐवज असलेली प्राचीन गुंफा


लाखभर साहित्यसंपदा व साहित्यऐवज असलेली प्राचीन गुंफा..

लहानपणी एक गोष्ट होती 'अलिबाबाची गुफा'. आज खरोखरच एका भव्य दिव्य अलिबाबाच्या गुहेचा यथोचित अनुभव आला. सुरवातीच्या कक्षात 'सोन'...त्यातल्या आत 'सोन'...आणि त्यातल्या आत 'हिरे-दागिने-माणिक'
फरक एवढाच होता कि, या गुहेत होता तो असंख्य पुस्तकांचा,मासिकांचा,ग्रंथांचा,असंख्य लेखकांनी आजवर लिहलेल्या लेखकांचा,अनुवादित साहित्याचा,जेष्ठय समीक्षक-साहित्यिक स्व.द भि कुलकर्णी यांनी मृत्यइच्छेत दिलेल्या दहा हजार पुस्तकांचा आणि दुर्मिळ साहित्याचा 'अलौकिक साहित्य ऐवज'...आणि त्याशिवाय तिथे असलेल्या दोन लाख संदर्भ पुस्तकांचा....
हि कल्पनेतील कथा नसून वास्तवातील आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या जेष्ठय साहित्यिक-ग्रंथालय संचालक श्री.श्याम जोशी सर यांच्या 'ग्रंथसखा' या वाचनालय संस्थेची आहे. मूळ वाचनालयाच्या सोबतच श्याम जोशी सरांनी आणखी एका इमारतीच्या तळघरात वाचनालायसोबतच 'संशोधन केंद्र' निर्माण केले आहे.तेथे बसून अनेक संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना,अभ्यासकांना आणि साहित्यप्रेमींना साहित्यातील अनेक पुस्तकांचा शोध घेता येतो सोबतच आत मध्ये बसण्याची व्यवस्था आहे.तसेच तिथे ग्रंथपाल विषयीचे प्रशिक्षण वर्ग देखील चालवले जातात.
त्यानुरूप आतील दालनात पंधरा-वीस विद्यार्थी बसतील एवढी जागा आणि 'आधुनिक अध्ययन कक्ष' स्थापन करण्यात आले आहे.तसेच वाचनालयाचे वाचक वर्ग हे केवळ बदलापूर किंवा जवळील स्थानिक नसून तेथे मुंबई शहरातील कुर्ला,वडाळा,अंधेरी,दादर येथून वाचक वर्ग आणि सभासद येतात तसेच 'अध्ययन' आणि 'संशोधन' अभ्यासासाठी या संशोधन केंद्रात नाशिक,भुसावळ,लातूर ई. लांबच्या आणि मुंबई बाहेरच्या शहरातून साहित्य संशोधक,अभ्यासक आणि साहित्य प्रेमी येथे येतात इथे आल्यावर त्यांना राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून संचालकांनी स्वतंत्र  आराम खोलीची व्यवस्था केलेली आहे. सुमारे लाखभर पुस्तकांनी सुसज्ज असलेलं हे संशोधन केंद्र हे शासनाच्या अनुदानाशिवाय केवळ ग्रंथ संचालक श्याम जोशी आणि ग्रंथसखा वाचनालयातील हजारो वाचक यांच्या सहयोगाने आणि देणगीने आजवरच्या सर्व ग्रंथालय,वाचनालय आनइ संशोधन केंद्र असलेले ठाणे जिल्यातील एकमेव 'स्वायत्त मराठी विद्यापीठ' ठरले आहे.
वर्षानुवर्षे निर्मित साहित्य 'ग्रंथसखा' या वाचनालय संस्थेने आणि तेथील संचालक श्याम जोशी सर तसेच तेथील अधिकारी वर्ग आणि वाचकांनी तेथील साहित्य संस्कृती आणि वाचन परंपरा समृद्ध केली आहे. आणि या साहित्य सेवा चळवळीला दिन रात अखंडपणे वाचक आणि साहित्यप्रेमींना उपलब्ध करून देण्याची जवाबदारी आणि खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती संवर्धन,जतन करण्याचे मौलिक कार्य आजही अतिशय तन्मयतेने,निष्ठेने आणि साहित्यसेवेत आपले जीवन समर्पण करून श्री.श्याम जोशी सर करत आहे.
नुकताच सरांना महाराष्ट्र शासनाचा 'भाषा संवर्धक' हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
अश्या या महान साहित्यसेवे साठी अवघ जीवन झोकून देणाऱ्या श्याम जोशी सरांना  आणि त्यांच्या साहित्य सेवेला मानाचा मुजरा...

शब्द संकलन - सचिन सुशील

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम

Wednesday, 18 January 2017

कवी रमेश महारू बोरसे.

'एक दिवस,एक लेखक'...

नाव - रमेश महारू बोरसे. 

  
साहित्यिक परिचय - कवी, लेखक, त्रैमासिक संपादक.

धुळे जिल्ह्यातील 'विंचूर' ह्या खेडेगावात जन्मलेल्या रमेश बोरसे सरांचे बालपण अल्पवयातच आईचे छत्र हरपल्यामुळे तसे कोमेजलेलेच.वडीलांनी शिक्षक, स्वातंत्र्य लढ्यातील काही भूमिगतांची मदत, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचे काम,विविध संस्थांमध्ये पदाधिकारी, समाजकारण बर्याच कार्यात सक्रिय असूनही कुटुंबासाठी धनसंचय मात्र केला नाही त्यामुळे सततची आर्थिक कोंडी. आर्थिक परिस्थिती कायम हलाखीची, आई नसल्यामुळे उपासमार, तब्येतीच्या तक्रारी हे सगळे सहन करून शिक्षण पूर्ण करायची धडपड चालू ठेवली. कधी शेती, शेतमजूरी, सुरत येथे विविध ठिकाणी बालकामगार म्हणून काम करून कसेबसे बि.ए.बि.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.नंतर ग्रामिण भागात शिक्षक म्हणून रूजू झाले व अल्पावधीतच शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. निवृत्तीनंतर किराणा दुकानही चालवले. अशाप्रकारे विविध क्षेत्रातील अनुभवांमुळे नानाविध व्यक्ती प्रवृत्तींशी संबंध आला. साहित्याची आवड मुळातच पण जगण्याच्या संघर्षात मागे पडलेली साहित्य साधना निवृत्तीनंतर मात्र उत्साहात सुरू केली.
मराठीत बर्याच कविता लेखन करूनही प्रकाशित नाही केल्या. मराठीत लेखन करून प्रसिद्धी मिळवता आली असती पण मायबोली अहिराणीचा मृत भाषेत समावेश होऊ नये यासाठी खान्देशी बोली अहिराणीचा प्रचार प्रसाराचा विडा उचलला. खांदेशातील 'गावकरी' ह्या वृत्तपत्रात "आप्पान्या गप्पा" नावाने सद्य सामाजिक स्थितीवर भाष्य करणारं स्तंभ लिखाण सुरू केलं. ह्या लेखांचं संकलन करून नंतर "आप्पान्या गप्पा भाग १" हे पुस्तक प्रकाशित झालं.ह्यात व्यक्ती चित्रणे, बैल - कपिला गाय यांसारख्यां प्राण्यांचं शेतकर्याच्या जीवनातील महत्व, खांदेशी सणांची वैशिष्ट्ये, दासबोधातील गुण विवेचन सोप्या ओघवत्या खांदेशी शैलीत मांडले.

" मायनी याद वनी, मन भरी वनं,
कायीजनं पाणी व्हयनं...
ते आसू गाईसन वाहू दिधं नही,
शाईवरी कागदवर उतारं... "

....असं वर्णन करत पहिल्या लेखात आईचं वर्णन केलं.

" आप्पान्या गप्पा - भाग २रा" ह्या दुसर्या प्रकाशित पुस्तकात हुंडा..बस्ता अशा चुकीच्या - मुलीला व पालकांना वेठीस धरणार्या रूढी, राजकारण, समाजकारण, शिक्षणपद्धती अशा विविध विषयांवर भाष्य केले.
" पूरणपोयी" ह्या काव्यसंग्रहात सोप्या शब्दात तत्वज्ञान सार कथन करणार्या बहिणाबाईंची परंपरा जोपासत सुंदर खांदेशी बोलीत विविध कविता आहेत.

"जे सर्वास्ले भिंगरीना मायक फिरावस, त्यालेज मन म्हणतस"

अशा मोजक्या शब्दांत मनाला अचूक बांधले.

" खेडामा र्हाणार कुणबी
हंगाममा धान्य न्या राशी पिकाडस,
त्याज कुणबी थोडाज दिनमा
रेशन नी रांगम्हा उभा दिखतस"

...असं म्हणत समाजातलं विरोधाभासी चित्र दर्शवणारी कविता.

'खरं धन' ही लता दिदिंवरील व्यक्ती गौरवपर कविता, ' इसनू रोतडी खेयेल शे" , 'येकदिन' अशा समाजातील अन्यायावर भाष्य करणार्या विद्रोही कवितांचा यात समावेश आहे."हिरवं बेट" ही अर्धांगिणिचं महत्व विषद करणारी कविता अहिराणीतही स्री जाणिवा उल्लेखाची सुरूवात करणारी ठरते. खास अहिराणी वाक्प्रचार, अस्सल खांदेशी उपमा ,शब्द कोट्या , विद्रोह, प्रयोगशिलता, प्रासादिकता इ. वैशिष्टे असलेल्या कवितांनी सजलेला पूरणपोयी हा काव्यसंग्रह...

"दिवायीना पणतिम्हा
तेल आशानं टाकजो,
मनमधला सपनले
जागेपणे रंग भरजो."

म्हणत आशावादही व्यक्त करतो...

स्वत:ची पुस्तके प्रकाशित करून न थांबता अहिराणी वाचन लिखाणाची गोडी लागावी, अहिराणीचा प्रचार व्हावा या हेतूने " खांगेशनी वानगी" नावाने अहिराणी त्रैमासिक सूरू केले.ह्यात विविध लेखत कवींचे कथा, कविता, माहितीपर लेख, चारोळ्या असे विविध साहित्य प्रकार प्रकाशित केले जातात.
" आपली मायबोली अहिराणी आमरित थाईन भी सरशी" म्हणत खांदेशी बोली अहिराणी बद्दलची अस्मिता व्यक्त करणार्या श्री. रमेश बोरसे यांचा आपल्या मायबोलीचे रूण साहित्य सेवेद्वारा जपण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे..

शब्द संकलन/परीचय लेखन - हिमनील बोरसे

संकल्पना - सचिन सुशील

'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम.