Sunday, 26 March 2017

लेखक बाबुराव बागुल

बाबूराव रामचंद्र बागूल

(जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे  मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, कष्टकऱ्यांच्या जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठ्यांच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.

१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ’जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ’जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ’मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. .....